कृषि महाविद्यालय, मुल तर्फे राजगड येथे कृषि दिन उत्साहात साजरा
Category: कृषि दिवस

- कृषि दिंडी, बांधावर भेटी व शेतकरी मार्गदर्शनातून कृषि तंत्रज्ञानाचा जागर
मुल ( प्रा .चंद्रकांत मनियार )
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या कृषि दिनाचे औचित्य साधून यंदाचा कृषि दिन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याच्या सूचना डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला चे मा. कुलगुरू डॉ. शरदराव गडाख यांच्या सूचने नुसार कृषि महाविद्यालय, मुल यांच्या वतीने राजगड येथे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कृषि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ ते ९ वाजता कृषि दिंडी काढून करण्यात आली. कृषि महाविद्यालयातील विद्यार्थीनी , प्राध्यापक तसेच राजगड व बेलगाटा शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिंडीच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक शेती, पीक विविधीकरण, माती आरोग्य संवर्धन आणि शेतकरी कल्याण योजनांबाबत जनजागृती करण्यात आली. कृषि दिंडीदरम्यान विद्यार्थीनीनी विविध कृषि संदेश असलेले फलक, घोषवाक्ये व माहितीपर संदेशांच्या माध्यमातून गावातील नागरिकांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत कृषिविषयक माहिती जाणून घेतली. यानंतर कृषि महाविद्यालयातील विद्यार्थीनी व शास्त्रज्ञांनी राजगड परिसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी दिल्या, तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा राजगड व ग्रामपंचायत राजगड परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे, यांनी यावेळी शेतातील विविध पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. धान व कापूस पिकांचे विविध वाणांबद्दल सविस्तर माहिती दिली, तसेच कृषि दिन का साजरा करावा यांचे महत्व पटवून दिले. उद्यान विद्या विभागाचे प्राध्यापक डॉ. रमाकांत गजभिये, यांनी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती पद्धतीचा अवलंब करून जमिनीची सुपीकता वाढवावी व उत्पादन खर्च कमी करावा, या उद्देशाने मार्गदर्शन केले. यावेळी जीवामृत पिकांमध्ये योग्य वापर व त्याचे फायदे, पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यासाठी उगवण चाचणी (Germination Test) करण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
श्री. देवानंद कुसुंबे, कृषिविद्या विषयतज्ञ यांनी योग्य रोपवाटिका व्यवस्थापन, योग्य लागवड अंतर, तण व्यवस्थापन, संतुलित खत व्यवस्थापन, व पिकाच्या अवस्थेनुसार पाण्याचे योग्य नियोजन करून पाणी बचत व उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले. डॉ. भूषण ठाकरे, कृषि किटकशास्त्र विषयतज्ञ यांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून पिकांवरील किडींचे नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्क व दशपर्णी अर्काची फवारणी करावी, असे आवाहन केले. दशपर्णी अर्कामध्ये विविध वनस्पतींच्या पानांचा अर्क असल्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी, अळीवर्गीय किडी यांचे व्यवस्थापन करण्यास मदत होते असे सांगितले.
कृषि महविद्यालय मूल येथील डॉ. व्ही. जी. अतकरे, सहयोगी अधिष्ठाता व विषयतज्ञ यांनी बांधावर भेटीदरम्यान धान, कापूस, भाजीपाला व इतर पिकांमधील सद्यस्थिती, पीक वाढीतील अडचणी, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना सुचविण्यात आल्या. कृषि दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामध्ये “शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि ज्ञान पोहोचविणे” हा मुख्य उद्देश ठेवण्यात आला होता. कृषि शिक्षण आणि प्रत्यक्ष शेती यांच्यातील दुवा मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना सुधारित बियाणे निवड, बीज प्रक्रिया, संतुलित खत वापर, जैविक निविष्ठांचा वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि उत्पादन खर्च कमी करण्याच्या तंत्रज्ञानाबाबत माहिती देण्यात आली. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना नवीन कृषि तंत्रज्ञानाची माहिती मिळाली तसेच कृषि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतातील समस्या समजून घेण्याची संधी मिळाली. कृषि महाविद्यालय आणि शेतकरी यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषि महाविद्यालय, मुल येथील सहायक प्राध्यापक श्री. नागेश नवघरे, श्री. अजय उईके व ग्रामीण कृषि कार्यानुभव (RAWE ) विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. राजगड येथील शेतकरी बांधवांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्रिया बोढे आणि कु.गणिका बुधे यांनी केले व उपस्थितांचे आभार कु.समृद्धी दडगेलवार यांनी मानले.