सोमनाथ येथे श्रम संस्कार छावणी 16 मे पासून

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

“महारोगी सेवा समिती, वरोरा” संचालित “श्रमतीर्थ सोमनाथ प्रकल्प” येथे आयोजित “आंतर भारती – भारत जोडो श्रमसंस्कार छावणी” शिबीर या वर्षी 16 मे 2026 पासून 21 मे 2026 पर्यंत होणार असून २१ ते ५५ वर्षे वयोगटातील निवडक फक्त १०० जणांनाच सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी 30एप्रिल पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे.
गेल्या अनेक दशकांपासून हजारो तरुणांच्या आयुष्याला दिशा देणारी ही छावणी, यंदाही नव्या उत्साहाने सज्ज झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच मुल तालुक्यातील सोमनाथ येथील श्रम संस्कार छावणी ही ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून चालवली जाणारी एक प्रेरणादायी युवा चळवळ आहे. या छावणीचा खरा उद्देश युवा पिढीच्या शक्तीला नवनिर्मितीच्या वाटा उपलब्ध करून देणे आणि त्यांना सामाजिक कार्याची जोड देणे, हा आहे. स्व.बाबा आमटे यांनी १९६७ मध्ये सोमनाथच्या जंगलात या छावणीची सुरुवात केली. ही छावणी सहसा दरवर्षी उन्हाळ्यात होणारी छावणी श्रमदानावर आधारित आहे, जिथे युवक स्वतःहून शारीरिक श्रम करतात. या शिबिरात सहभागी झालेले युवक बहुभाषिक प्रेरणागीते गात गात, श्रमप्रतिष्ठेचे नारे देत सकाळी श्रमदानासाठी तलावाचे खोलीकरण, शेती कामे, झाडे लावणे, अश्या कार्यात श्रमदानं करण्याच्या हेतूने सज्ज होतात. युवकांचा बौद्धिक विकास व्हावा म्हणून दुपारच्या सत्रात सामाजिक विकास आणि परिवर्तन यावर आधारित तज्ञ मंडळींचे चर्चासत्रे होतात. एकंदरीत या शिबिरामुळे युवकांना आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्पाच्या कार्याची ओळख होते आणि त्यांच्या मध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव होते. या शिबिरामध्ये महाराष्ट्रच नव्हे तर अन्य राज्यातून सुद्धा युवक-युवती मोठया संख्येने सहभागी होतात. हे शिबिर युवकांसाठी एक मोठे व्यासपीठ आहे.
थोडक्यात, सोमनाथची श्रमसंस्कार छावणी ही तरुणांना कष्टाची गोडी लावणारी आणि सामाजिक बांधिलकी शिकवणारी एक शाळा आहे. स्व. बाबा आमटे यांच्या निधनानंतर त्यांच्या सुपुत्रांनी  तसेच कुटुंबातील इतर सदस्यांनी ही चळवळ निरंतर सुरू ठेवली आहे.
श्रमसंस्कार छावणीला हजारपेक्षा कमी तरुण मंडळी आली तर आपली निराशा होईल, असे स्व. बाबा आमटे त्यावेळी म्हणाले होते. पण त्यांची निराशा झाली नाही, हे विशेष. म्हणतात की हजाराच्या वर युवक-युवती सोमनाथला आल्या. श्रमिक कार्यकर्ता विद्यापीठ व मानव शक्तिसंवर्धन केंद्र म्हणून या कामाची सुरवात अतिशय उत्साहाने व उमेदीने झाली.