Category: रस्ता सुरक्षा
written by Chandrakant Maniyar | August 26, 2026

मुल ( मेहुल मनियार )
शिक्षण प्रसारक मंडळ, मुल द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय, मुल येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि जन आक्रोश संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करणे, रस्त्यावर सुरक्षितपणे वावरण्याच्या सवयी विकसित करणे तसेच अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ, मुलचे अध्यक्ष ऍड. अनिल वैरागडे होते. व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ, मुल चे सचिव मान. शशिकांत धर्माधिकारी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अनिता वाळके, पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर, जन आक्रोश एनजीओ, नागपूरचे अध्यक्ष प्रकाश खांडेकर, गिरीश देशपांडे, रमेश शहारे आणि दत्तात्रय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात ऍड. अनिल वैरागडे यांनी रस्ता सुरक्षा ही आजच्या काळातील अत्यंत गंभीर आणि जिव्हाळ्याची सामाजिक समस्या असल्याचे सांगितले. रस्त्यावर वाहन चालवताना काही मिनिटे वाचविण्यापेक्षा आपला जीव आणि इतरांचा जीव सुरक्षित ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणात मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावी असे आवाहन केले. गिरीश देशपांडे यांनी रस्ता सुरक्षेच्या सामाजिक आणि मानवी पैलूंवर मार्गदर्शन करताना सांगितले की, एका व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे केवळ त्याचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य प्रभावित होऊ शकते. त्यामुळे वाहन चालविताना संयम, शिस्त आणि जबाबदारीची भावना असणे आवश्यक आहे.
याप्रसंगी रमेश शहारे, दत्तात्रय कुलकर्णी, प्रकाश खांडेकर यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणे, वाहतूक सिग्नलचे पालन करणे, हेल्मेट व सीट बेल्टचा योग्य वापर करणे आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे या बाबी त्यांनी विशेषत्वाने स्पष्ट केल्या.प्रोजेक्टरच्या माध्यमातून विविध अपघातांची कारणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणारे परिणाम आणि सुरक्षित वाहनचालकाची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगण्यात आली. विशेषतः दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर केवळ पोलिसांच्या भीतीपोटी न करता स्वतःच्या सुरक्षिततेसाठी करावा, असे आवाहन करण्यात आले. रस्त्यावर पादचाऱ्यांनीही वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांनी रस्ता सुरक्षा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जीवनातील सुरक्षिततेचे महत्त्व समजण्यास मदत झाली असल्याचे सांगितले. जनआक्रोश संस्थेने रस्ता सुरक्षा या विषयावर घेतलेल्या या जनजागृती उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सिकंदर लेनगुरे यांनी केले.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. राहुल बोधे तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.