“समर्थ” काँग्रेसमध्ये –आता भाजपचा नवीन संकटमोचक कोण???

मूल

स्थानिक राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अन्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे प्रशांत समर्थ यांनी,प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस,काँग्रेसचे वरिष्ठ नेता संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसचा झेंडा हातात घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

मूल नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. कारण हे क्षेत्र विधायक सुधीर मुनगंटीवार यांचा मजबूत गड म्हणून ओळखले जाते. अनेक वर्षांपासून भाजपचे वर्चस्व असलेल्या या नगरपरिषदेत आता काँग्रेसकडून जोरदार लढत दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रशांत समर्थ यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्षात नव्या उर्जेची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे प्रशांत समर्थ यांच्या धर्मपत्नी एकता समर्थ या नगराध्यक्षपदाच्या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. त्यांच्या सौम्य, कार्यक्षम व सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वामुळे स्थानिक पातळीवर त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दुसरीकडे, भाजपसमोर मात्र आता मोठे आव्हान उभे ठाकले आहे — एकता समर्थ यांच्या विरोधात कोणाला रिंगणात उतरवायचे? पक्षांतर्गत चर्चांनुसार, या वेळेस नगराध्यक्षपदासाठी स्वच्छ प्रतिमा असलेला, समाजात आणि पक्षात सर्वमान्य तथा निष्ठावंत युवा कार्यकर्ता निवडणे ही पक्षाची गरज बनली आहे. कारण संतोष सिंह रावत यांच्या मार्गदर्शनात,प्रशांत समर्थ आणि एकता समर्थ यांच्या एकत्रित राजकीय रणनीतीमुळे काँग्रेसला, भाजपाकडून या निवडणुकीत टक्कर देणे सोपे जाणार नाही.

राजकीय विश्लेषकांच्या मते, प्रशांत समर्थ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हा केवळ व्यक्तीगत निर्णय नसून, तो स्थानिक राजकारणातील समीकरणे बदलणारा टप्पा आहे. भाजपला आता संघटनात्मक पातळीवर नव्याने रणनीती आखावी लागणार आहे. आगामी काही दिवसांत दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा होईल, मात्र सध्या तरी मूल नगरपरिषद निवडणूक “भाजप विरुद्ध समर्थ” या संघर्षाभोवती केंद्रित होणार असल्याचे दिसत आहे.

राजकारणातील ही नवी लढत केवळ पक्षांपुरती मर्यादित राहणार नाही, तर स्थानिक कार्यकर्त्यांच्या निष्ठा, संघटनशक्ती आणि मतदारांच्या भावनांवर तिचा थेट परिणाम दिसेल, असे जाणकारांचे मत आहे.