मूल तालूक्यासाठी गॅस सिलेंडर एजन्सी सुरु करुन ग्राहकांना २५ दिवसात सिलेंडर द्यावे

 

प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन
मूल – (मेहुल मनियार )

      मूल तालुका धानाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असून या तालुक्यात १०६ गावे व ४९ ग्रामपंचायती आणि १ नगर परिषद आहे व तालूक्याची लोकसंख्या दीड लाखाचे वर आहे.  या शहरात शासकीय कार्यालये, शिक्षण संस्था, उपजिल्हा रुग्नालय, औद्योगीक वसाहत, कृषी महाविद्यालय असून मूल तालूक्यात आजस्थितीत २५ हजाराच्या वर गॅस वापरणारे कुटूंब आहेत. प्रधानमंत्री उज्वला योजना व शासनाच्या अन्य योजना अंतर्गत मोफत आणि अनुदान तत्वावर गॅस वापरणारे दारीद्रय रेषेखालील गरीब कुटुंबही तालूक्यात मोठ्या संस्थंने लाभार्थी आहेत.

     मागील काही महिण्यापासून तालूक्यातील एच.पी. गॅस एजन्सी बंद केल्यामुळे तालूक्यातील हजारो गॅस ग्राहकांची गैरसोय होत आहे. सिलेंडरसाठी ग्राहकांना धावपळ करावी लागत आहे. ही गैरसोय लक्षात घेवून कंपनी प्रशासनाने मूल शहर आणि तालूक्यातील गॅस सिलींडर धारकांना सिलेंडर पुरवठा करण्याची जबाबदारी १२ कि.मी. अंतरावरील सावली आणि २२ कि.मी. अंतरावरील चिचपल्ली येथील गॅस एजन्सी कडे सोपविलीआहे. परंतू सावली आणि चिचपल्ली येथील गॅस एजन्सी मध्ये मूल शहर आणि तालूक्यातील गॅस सिलेंडर धारकांना नोंदणी करूनही वेळेवर गॅस उपलब्ध होत नसल्याने गृहिणींना चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे.

  शहरासाठी २५ दिवस व ग्रामीण साठी ४५ दिवसात गॅस सिलेंडर उपलब्ध करुन देण्यांत येईल असे सांगीतले जात आहे. परंतू फक्त महानगरपालीका शहरीकरणात येत असून मुल शहर हे ग्रामीण मध्येच येत असल्याने मूल शहरातील ग्राहकांना २५ दिवसात गॅस सिलेंडर देण्यांत यावे. तसेच तालुक्याची दीड लाख लोकसंख्या असलेल्या मूल नगरात त्वरित दुसरी गॅस एजन्सी देण्यात यावी. अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस,माजी जी.प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देताना न.प.उपाध्यक्ष व सभापती राकेश रत्नावार,काँग्रेस जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर, तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, ग्रामीण काँग्रेस नेते राजू पाटील मारकवार, सोसायटी अध्यक्ष संदीप कारमवार, न.प.बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, सामाजिक कार्यकर्ते संजय पडोळे, उपस्थित होते. गॅस सिलेंडर टंचाई बाबत मुख्यमंत्री नाम.देवेंद्र फडणवीस यांनाही इमेल द्वारे निवेदन पाठवून मूल शहरात व तालुक्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे.ही गैरसोय त्वरित दूर करण्यात यावी. अशी मागणी १८ मार्च २०२६ रोजी प्रदेश सरचिटणीस काँग्रेस संतोषसिंह रावत यांनी केली असता, सदरचे मागणी पत्र मुख्यमंत्र्यांचे सचिव मंत्रालय यांनी संबंधित विभागाकडे पाठविल्याचे ईमेल द्वारे संतोषसिंह रावत यांना कळविले आहे.