मूल शहर व तालुक्यातील वीज समस्यांवर तातडीने उपाययोजना करा

मूल  ( मेहुल मनियार )

     मूल शहर व तालुक्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध वीज समस्यांकडे महावितरण प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री राकेश शेषराव ठाकरे यांनी 17 ऑगस्ट 2026 रोजी महावितरण कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
मूल शहर व तालुक्यात गेल्या काही काळापासून वीजपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, विद्युत वाहिन्यांना झाडांच्या फांद्या व वेली लागणे तसेच वीज बिलांमध्ये अचानक वाढ होणे अशा विविध समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. या समस्यांवर तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदनातील प्रमुख मागण्या
विद्युत वाहिन्यांलगत वाढलेल्या झाडांच्या फांद्या व वेलींची छाटणी :
मूल शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब व विद्युत वाहिन्यांना लागून झाडांच्या फांद्या, वेली व झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच पावसाळ्यात दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा ठिकाणांची तातडीने पाहणी करून झाडांच्या फांद्या व वेलींची छाटणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
वारंवार वीज खंडित होणे व कमी दाबाच्या वीजपुरवठ्यावर कायमस्वरूपी उपाययोजना :
मूल शहर व तालुक्यात अनेक भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक, व्यापारी, व्यावसायिक तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर, क्षमतावाढ, नवीन विद्युत खांब व वाहिन्यांची दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी.
एप्रिल महिन्यात शून्य बिल व मे महिन्यात वाढीव बिल आकारणीची चौकशी :
मूल शहर व तालुक्यातील अनेक ग्राहकांना एप्रिल महिन्यात वीज बिल शून्य आले आणि त्यानंतर मे महिन्यात अचानक मोठ्या रकमेची वाढीव वीज बिले देण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे संबंधित ग्राहकांच्या बिलांची तपासणी करून मीटर रीडिंग व बिलिंग प्रक्रियेची चौकशी करण्यात यावी. तसेच संबंधित वीज बिल रीडिंग एजन्सीच्या कामाची चौकशी करून दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री राकेश शेषराव ठाकरे यांनी महावितरण प्रशासनाने या सर्व समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, तसेच मूल शहर व तालुक्यातील नागरिकांना नियमित, सुरक्षित व योग्य दाबाचा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी भाजपा मूल शहराध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, अनुसूचित जाती चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, भाजपा मूल शहर महामंत्री प्रशांत बोबाटे, भाजपा महामंत्री जितू टिंगूसले, भाजपा उपाध्यक्ष संदीप मोहबे,भाजपा ओबीसी आघाडी मूल शहर अध्यक्ष युवराज चावरे,किसान मोर्चा मूल शहराध्यक्ष विवेक मांदाडे, युवा मोर्चाचे रुपेश निकोडे,आनंद आक्केवार, सुनील कुकुडकर, तसेच भाजपा पदाधिकारी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.