Category: वार्षिक स्नेह सम्मेलन
written by Chandrakant Maniyar | January 12, 2026

मूल ( मेहुल मनियार )
शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालयाच्या विद्यार्थी मेळाव्याचा समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला. प्राचार्य डॉ.अनिता वाळके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून इंदिरा गांधी हायस्कूल जुनासुरलाचे मुख्याध्यापक बंडूभाऊ रोहनकर,
कृषक विद्यालय सुशी दाबगाव चे मुख्याध्यापक नंदूजी भरडकर,आनंद विद्यालय केळझरचे मुख्याध्यापक संजय येलेकार, सेवानिवृत्त प्राध्यापक चंद्रकांत मणियार, प्रा.डॉ. जी. एस. आगलावे,पर्यवेक्षक प्रा. दिनेश बनकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी प्राजु गावतुरे आदी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात महाविद्यालयातर्फे प्रमुख पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात प्रा. दिनेश बनकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन केले जाते, या संबंधाने माहिती दिली. बंडूभाऊ रोहनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून पुढे वाटचाल करावी,तसेच जीवनात शिस्तीला महत्त्व द्यावे असे सांगितले. नंदू जी भरडकर संजय येलेकर तसेच प्रा. चंद्रकांत मणियार यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची ताकद निर्माण करावी असे सांगितले. मेहनत केल्याने यश नक्की मिळते, असे सांगितले.
डॉ.अनिता वाळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयातर्फे आयोजित वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला देऊन आपल्या जीवनात जरी अपयश आले तरी न घाबरता समर्थपणे वाटचाल करावी आणि यशाच्या दिशेने पुढे जावे असे सांगितले. विद्यार्थी मेळाव्यात वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या विभिन्न स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
या समारोपिय कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. सागर मासिरकर यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.