शेतकरी आहे देशाचा खरा भाग्यविधाता, कृषी सप्ताहातून समृद्धीचा नवा मार्ग साधता!”

बोर्डो पेस्ट ते दशपर्णी अर्क, चारा प्रक्रिया ते शालेय जनजागृती 

मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )

        कृषी महाविद्यालय ,मुल च्या कृषी दुतांनी  ग्रामीण कृषी कार्यानुभव RAWE प्रकल्पाअंतर्गत कनेरी गावात दिनांक 1 ते 7 जुलै 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या “शाश्वत शेती व ग्रामीण विकास 7 दिवसीय जागृती सप्ताहा”ला शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. या उपक्रमातून शेतीपूरक तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले.
१ जुलै कृषी दिन:-
ग्रामपंचायत कनेरी येथे कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर, गडचिरोली येथील उद्यानविद्या विभागाचे कृषी तज्ज्ञ डॉ. सूचित लाडके होते, तर उद्घाटक म्हणून कणेरीचे सरपंच श्री. तुषार मडावी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रशेखर जक्कनवार, श्री. नेताजी लोंडे, श्री. शामजी कोलते, श्री. प्रभाकर लाडके, पोलीस पाटील श्री. गणेशजी मडावी तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कनेरी येथील मुख्याध्यापक श्री. युवराज मांदाडे उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक करत कृषी क्षेत्रातील उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. सूचित लाडके यांनी धान पिकांच्या विविध वाणांबाबत सविस्तर माहिती देत रोपवाटिका व्यवस्थापन, योग्य लागवड अंतर, तण व्यवस्थापन, संतुलित खत व्यवस्थापन तसेच पिकाच्या अवस्थेनुसार पाण्याचे नियोजन याविषयी मार्गदर्शन
केले.कृषी अभियांत्रिकी विभागाचे विषयतज्ज्ञ डॉ. अमरदीप डेरे यांनी कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध तंत्रांचा अवलंब करून उत्पादनक्षमता वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रम अधिकारी तथा कृषी विस्तार विभागाचे विषयतज्ज्ञ डॉ. आशिष लाडे यांनी जीवामृताचा प्रभावी वापर, त्याचे फायदे तसेच पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्यासाठी उगवण चाचणी (Germination Test) करण्याचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
3 जुलैबोर्डो पेस्टने रोग नियंत्रण स्वस्तात शक्य
कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात फळबागा व भाजीपाला पिकांवरील करपा, मर, तांबेरा रोगाच्या नियंत्रणाने झाला. कृषी तज्ञांनी शेताच्या बांधावरच “बोर्डो पेस्ट” तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
`100 ग्राम मोरचूद + 100 ग्राम चुना + 1 लिटर पाणी` या प्रमाणात तयार होणारी पेस्ट झाडाच्या खोडाला लावल्याने बुरशीजन्य रोग 80% पर्यंत कमी होतात अशी माहिती देण्यात आली. 5 हून अधिक शेतकऱ्यांनी यात भाग घेऊन पेस्ट स्वतः तयार करून पाहिली.


4 जुलै – युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्याने दूध उत्पादनात वाढ
दुग्ध व्यवसायिकांसाठी “चारा प्रक्रिया तंत्र” यावर भर देण्यात आला. कडबा आणि भुसा यामध्ये 4% युरिया द्रावण मिसळून 21 दिवस हवाबंद करून ठेवल्यास चाऱ्याची पचनक्षमता व पौष्टिकता 30% ने वाढते.यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारते आणि दूध उत्पादनात 15-20% वाढ होते असे सांगण्यात आले. 7 दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाची नोंद घेतली.

5 जुलै कणेरी गावात PRA कार्यक्रम संपन्न

सामाजिक व संसाधन नकाशातून शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या

कृषी महाविद्यालयाच्या RAWE प्रकल्पाअंतर्गत कणेरी गावात दिनांक 5 जुलै रोजी *PRA – Participatory Rural Appraisal* म्हणजेच सहभागी ग्रामीण मुल्यमापन कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचा उद्देश कानेरी गावातील संसाधने, समस्या आणि विकासाच्या संधी शेतकऱ्यांच्या सहभागातून जाणून घेणे हा होता.

 

PRA मध्ये काय करण्यात आले?
सामाजिक नकाशा : कानेरी गावातील घरे, जि.प. शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, मंदिर, विहिरी, हातपंप यांची माहिती नकाशावर काढली
या कार्यक्रमात कानेरी गावातील 20 हून अधिक शेतकरी, महिला व तरुण सहभागी झाले. सरपंच यांनी सांगितले की “PRA मधून मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करेल.”

6 जुलै – शालेय विद्यार्थ्यांना दिले शेतीचे धडे
या दिवशी जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन 60 विद्यार्थ्यांना “शेतीचे महत्त्व आणि अजैविक शेतीची गरज” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. रासायनिक खतांचा अतिवापर टाळून मृदा परीक्षणानुसार संतुलित खत व्यवस्थापन कसे करावे हे सोप्या प्रयोगातून दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने प्रश्न विचारले.
7 जुलै – दशपर्णी अर्क : नैसर्गिक शेतीकडे वाटचाल
समारोपाच्या दिवशी रासायनिक कीटकनाशकांना पर्याय म्हणून “दशपर्णी अर्क” तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. नीम, कडुलिंब, तुळस, धोतरा, बेशरम यांसारख्या 10 वनस्पतींपासून बनणारे हे अर्क फवारल्याने किडींचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादन खर्चात 60% बचत होते.

एकूण 7 दिवसात 60 हून अधिक शेतकरी, महिला बचत गट आणि 70 विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले. RAWE विद्यार्थ्यांनी केलेल्या परिश्रमाबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.