मुल शहरात ‘समर्थ’ पर्वाचा उदय: ५ जानेवारीला एकता समर्थ यांचा नगराध्यक्षपदाचा पदग्रहण सोहळा!

मुल
राजकारणात लाटेपेक्षा ‘लोकसंग्रह‘ मोठा असतो, याचे ज्वलंत उदाहरण मुल शहराने पाहिले आहे. सलग तीन टर्म पासून असलेल्या भाजपच्या सत्तेला सुरुंग लावत, काँग्रेसच्या सौ. एकता प्रशांत समर्थ यांनी नगराध्यक्षपदावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. येत्या ५ जानेवारी रोजी त्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न होणार असून, या दिवसापासून मुल शहराच्या विकासाचा एक ‘नवा अध्याय‘ लिहिला जाणार आहे.

सामान्यातून असामान्य झेप
​नूतन नगराध्यक्षा एकता समर्थ या नागपूरमधील एका सामान्य सरकारी कर्मचारी कुटुंबात जन्मल्या. पदवीधर असलेल्या सौ. समर्थ यांना पहिल्यापासूनच सामाजिक कार्याची ओढ आहे. महिला बचत गट आणि सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता शहराच्या ‘प्रथम नागरिक‘ म्हणून त्या पदभार स्वीकारणार आहेत.

प्रशांत समर्थ: राजकारणातील ‘पीएचडी’
​या विजयाचे मुख्य शिल्पकार प्रशांत विलासराव समर्थ यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात आहे. जरी त्यांचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले असले, तरी समाजकारण आणि राजकारणातील त्यांचा अनुभव एखाद्या ‘पीएचडी‘ धारकाला लाजवेल असाच आहे. आपल्या वडिलांकडून मिळालेला मनमिळाऊ स्वभाव आणि जनसेवेचा वारसा त्यांनी जपला आहे. चौथा टर्म नगरसेवक म्हणून निवडून येणाऱ्या प्रशांत समर्थ यांनी पक्षीय राजकारणापेक्षा ‘माणसं जोडण्याला’ प्राधान्य दिले.

प्रस्थापितांना धक्का आणि ऐतिहासिक विजय
​विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात समर्थ यांनी पुकारलेले बंड यशस्वी ठरले. नगराध्यक्ष पदाचा अत्यंत तगड्या प्रतिस्पर्ध्याचा २०८१ मतांनी पराभव करत त्यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवला. केवळ नगराध्यक्षच नव्हे, तर २० पैकी १८ नगरसेवक निवडून आणून त्यांनी विरोधकांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. जनतेने प्रशांत समर्थ यांच्या कामाची पावती म्हणून हा ‘विजयाचा गुलाल‘ त्यांच्या पदरात टाकला आहे.

​५ जानेवारी: नव्या आशेचा उदय 
​५ जानेवारी रोजी होणाऱ्या पदग्रहण सोहळ्याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. प्रशांत समर्थ हे दिलेला शब्द पाळणारे ‘खरे सोने’ आहेत, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. एकता समर्थ या शहराला प्रगतीपथावर नेतील, असा विश्वास व्यक्त होत आहे. मुल शहरात सध्या आनंदाचे वातावरण असून, हा सोहळा एका नव्या विकासाची पहाट ठरणार आहे.