मूल ( मेहुल मनियार )
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे फार नुकसान झाले. दोन वर्षापासुन शेतकऱ्यांना आर्थीक मदत न मिळाल्याने मूल तालुक्यातील हळदी येथील शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा लक्ष देत नसल्याने शेवटी शेतकऱ्यांनी भाजपाच्या जेष्ठ नेत्या, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचेकडे जावुन सदर मागणीचे निवेदन दिले, श्रीमती फडणवीस यांनी तात्काळ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर प्रश्न येत्या काही दिवसातच सोडविण्याचे आश्वासन त्यांना दिले. यामुळे अवकाळी पाऊस मदत निधीचा मार्ग मोकळा होत असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केला आहे.
-
सन 2024 या वर्षात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. याबाबत शेतकऱ्यांनी तालुका प्रशासनाला माहिती दिली, दरम्यान शासनाकडुन शेतकऱ्यांना मदत निधी मिळावी यासाठी शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. संबधित विभागाने पंचनामे करून अहवाल तालुका प्रशासनाकडे सादर करण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी प्रसिध्द केली, तसेंच यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणही केले. जवळपास 3 महिने लोटुन गेले तरी सुद्धा शेतकऱ्यांना पिक बुडीचे पैसे अद्यापही न मिळाल्याने मूल तालुक्यातील हळदी येथील शेकडो शेतकऱ्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांची भेट घेवुन सन 2024 मध्ये अवकाळी पावसामुळे पिकबुडीचे पैसे शासनाकडून मिळवून देण्याची मागणी केली. श्रीमती फडणवीस यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ पिकबुडीचे पैसे पाठविण्याची मागणी केली, यामुळे येत्या काही दिवसातच पिकबुडीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची विश्वसनिय माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये श्रीमती फडणवीस यांचे आभार मानले.


