मूल ( प्रा. चंद्रकांत मनियार )
पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ संलग्नीत मूल येथील कृषि महाविद्यालय, येथे 15 मे 2026 रोजी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा तयारीस प्रोत्साहन देण्यासाठी प्लेसमेंट सेल व स्पर्धा परीक्षा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने “सामान्य बँकिंग परीक्षांची तयारी” या विषयावर १० व्या विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून भारतीय स्टेट बँक, मुल शाखेचे सहाय्यक व्यवस्थापक सानिध्य दळवी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. जी. अतकरे तसेच डॉ. आर. पी. गजभिये, प्राध्यापक (उद्यानविद्या) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात सहाय्यक प्राध्यापक (मृद विज्ञान) नागेश नवघरे यांच्या प्रास्ताविकपर भाषणाने झाली.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मान. सानिध्य दळवी यांनी विद्यार्थ्यांना विविध बँकिंग परीक्षांची रचना, अभ्यासक्रम, वेळेचे नियोजन, अभ्यास करण्याच्या प्रभावी पद्धती तसेच मुलाखतीसाठी आवश्यक कौशल्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेचा अभ्यास करताना नामवंत शिक्षकांचे विशिष्ट युट्यूब चानेल्सचा वापर करून डिजिटल प्लॅटफॉर्मचा पुरेपूर उपयोग करण्याचे सांगितले. त्यांनी स्वतःच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना सातत्य, आत्मविश्वास आणि योग्य नियोजनाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील करिअर संधींबाबत उपयुक्त माहिती मिळाली. या कार्यक्रमात उद्यानविद्या विभागाचे प्राध्यापक, डॉ. आर. पी. गजभिये यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी नियमित अभ्यास, सकारात्मक दृष्टीकोन आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाप्रती एकाग्र राहण्याचे आवाहन केले. विश्लेषणात्मक मार्गांनी विचार करून प्रश्नपत्रिका सोडवण्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, डॉ. व्ही. जी. अतकरे यांनी विद्यार्थ्यांना करिअर घडविण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसित करावे, असे सांगितले. कठीण काळ आपल्याला शिक्षा देण्यासाठी येत नाही, तर आपल्याला संयम शिकवण्यासाठी येतो म्हणून अपयशाला खचून न जाता प्रयत्न सुरु ठेवावे, तसेच अशा प्रकारचे मार्गदर्शनपर कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.




